रायबरेली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजिंक्य नाहीत. ती बाब लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सिद्ध होईल, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरूवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आई समवेत उपस्थित असलेल्या राहुल यांनी मोदींवरील टीकेची झोड कायम ठेवली. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राफेल प्रकरणी मोदी सरकारला झटका देणारा निर्णय दिला. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी मोदींना पुन्हा आव्हान दिले. मोदींनी राफेर करारावर माझ्याशी खुली चर्चा करावी. त्या चर्चेसाठी पंतप्रधान निवासस्थानी जाण्याचीही माझी तयारी आहे. चर्चेनंतर मोदी कुणाच्याच डोळ्यांना डोळे भिडवून पाहू शकणार नाहीत. त्यांनी माझ्यावर कुठलीही कारवाई करावी, असे आव्हानही राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळात काहीच केले नाही, असे आरोप त्यांनी यावेळी केला. राफेल करार हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप कॉंग्रेसने लावून धरला आहे.