ते सत्याचा सामना करू शकत नाहीत
मोरेना – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता काहीही म्हणूद्या. पण, त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.
मध्य प्रदेशातील प्रचार सभांमध्ये बोलताना राहुल यांनी मोदींवरील शाब्दिक हल्लाबोल सुरूच ठेवला. मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयश आले, या सत्याचा सामना मोदी करू शकत नाहीत. आश्वासने पूर्ण करण्याऐवजी मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय घेऊन गरिबांचे, तरूणांचे रोजगार हिरावले.
नोटाबंदीचा लाभ उठवत देशातील भ्रष्ट लोकांनी काळ्या पैशांचे रूपांतर पांढऱ्यात केले. त्या चोरांना मोदींची मदत मिळाली, असा आरोप राहुल यांनी केला. परदेशांत जाऊन मोदींनी अनेक उद्योगपतींची भेट घेतली. त्यांनी अनेकांना आलिंगने दिली. मात्र, देशातील सामान्य जनतेशी, गरिबांशी आणि महिलांशी ते कधीच बोलले नाहीत. मी उद्योगपती अनिल अंबानी यांना कधीच आलिंगन दिलेले नाही. मी गरीब जनतेबरोबर राहील, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.