नवी दिल्ली – प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पुर्ण होण्याच्या आधीच दिल्लीत सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. आज तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुूल गांधी यांची भेट घेऊन राजकीय स्थितीवर चर्चा केली. 23 मे रोजी लोकसभेची मतमोजणी होणार आहे. त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजेच 21 मे रोजी दिल्लीत सर्वच विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्याच्या विषयावर त्यांच्यात यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
नायडू येथून आज पश्चिम बंगाल मध्ये ममतांच्या प्रचारासाठी रवाना झाले त्यापुर्वी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे अजून दोन टप्पे बाकी आहेत. त्याच्या आतच राजकीय पक्षांनी या हालचाली सुरू केल्या आहेत. अलिकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केरळ व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संभाव्य राजकीय स्थितीबाबत चर्चा केली आहे.