नोटाबंदीवरून साधला निशाणा
चंडीगढ -कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तो निर्णय घेण्याआधी मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सल्ला घ्यायला हवा होता. तसे झाले असते तर अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली नसती, असे राहुल यांनी म्हटले.
पंजाबमधील एका सभेत बोलताना राहुल यांनी नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) मुद्द्यांवरून मोदींवर टीकास्त्र सोडले. त्या दोन निर्णयांतून मोदींनी अर्थव्यवस्था उद्धवस्त केली. नोटाबंदीमुळे राष्ट्रीय उत्पन्नात घट होईल, असे भाकीत मनमोहन यांनी केले होते. ते खरे ठरले. मोदी आधी मनमोहन यांची खिल्ली उडवायचे. मनमोहन यांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेचा उल्लेख ते झोपलेला हत्ती म्हणून करायचे.
आता मोदी स्वत:च्या पाच वर्षांच्या राजवटीनंतर मनमोहन यांची खिल्ली उडवत नाहीत. आज संपूर्ण देशच मोदींची टर उडवत आहे, असे राहुल म्हणाले. लोकसभा निवडणूक काळात मनमोहनही प्रसारमाध्यमांना सामोरे जात मोदींवर पलटवार करत आहेत.