कोलकता – आताच्या लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस केंद्राच्या सत्तेत परतेल. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपला एकमेव पर्याय आहेत, अशी भूमिका कॉंग्रेस नेते आणि अभिनेते राज बब्बर यांनी शुक्रवारी मांडली.
प्रदेशाध्यक्ष या नात्याने उत्तरप्रदेश कॉंग्रेसची धुरा सांभाळत असलेले बब्बर पश्चिम बंगालच्या प्रचार दौऱ्यावर होते. येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. बंगालमधील भाजपच्या वाढीला तृणमूल हातभार लावत आहे, अशी टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मुलाखतीचा संदर्भ दिला. तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ते आणि बंगाली मिठाया पाठवतात, अशी माहिती मोदींनी त्या मुलाखतीत दिली होती. त्याकडे अंगुलिनिर्देश करून बब्बर म्हणाले, भाजपच्या विरोधात लढण्याबाबतच्या तृणमूलच्या विश्वासार्हतेवर जनतेने विचार करावा. मुक्त आणि न्याय्य वातावरणात निवडणूक झाल्यास आपला पराभव होईल, अशी भीती तृणमूलला वाटते. त्यातून तो पक्ष हिंसाचाराचा मार्ग अवलंबत आहे, असा आरोपही त्यांनी केला.