वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर पक्ष प्रवक्त्यांनी केली घोषणा
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. ते अद्याप राजीनाम्यावर ठाम असल्याने त्या संबंधात विचारविनीमय करण्यासाठी आज ज्येष्ठ नेते ए. के ऍन्टोनी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर राहुल गांधी हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि कायम राहतील अशी घोषणा पक्षातर्फे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली आहे. या बैठकीत हरियाना, जम्मू काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यातील निवडणूक तयारीचाही आढावा घेण्यात आला.
राहुल गांधी यांनी 25 मे रोजी बोलावण्यात आलेल्या अ भा कॉंग्रेस महासमितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण कार्यकारणीने त्याचवेळी त्यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावला होता. तरीही त्यांनी राजीनाम्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्षात अनिश्चीततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष नेमला जाण्याचीही चर्चा सुरू झाली होती.
या पार्श्वभूमीवर आज ही पक्ष नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीला अहमद पटेल, मल्लिर्कार्जून खरगे, गुलामनबी आजाद, पी चिदंबरम, के सी वेणुगोपाल, सुर्जेवाला, जयराम रमेश, आनंद शर्मा इत्यादी नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या सर्व समित्या आता रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहितीहीं सुर्जेवाला यांनी दिली.