पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तूर्त ग्वाही नाही
कोलकाता – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे चांगले नेते आहेत. त्यांना देशाची चिंता आहे, अशी स्तुतिसुमने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी उधळली. मात्र, विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांना स्वीकारण्याची ग्वाही तूर्त देण्याचे त्यांनी टाळले.
तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणारे चंद्राबाबू पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. विरोधकांना एकत्र करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर, केंद्रात विरोधकांची सत्ता येण्याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
विरोधकांनी 1996 मध्ये केंद्रात सरकार स्थापन करताना कॉंग्रेसला बाहेर ठेवण्याची चूक केली. यावेळी ती चूक घडणार नाही, असे त्यांनी म्हटले. विरोधकांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत बोलताना ते म्हणाले, संख्याबळ पाहून पंतप्रधानपदाबाबत सहमतीने निर्णय घेतला जाईल. मी स्वत: त्या पदाच्या शर्यतीत नाही.
आंध्रात लोकसभेच्या केवळ 25 जागा आहेत. ती संख्या खूपच कमी असल्याने मी केवळ इतरांना पाठिंबा देऊ शकतो. अर्थात, त्यातून मी राष्ट्र उभारणीसाठी योगदान देऊ शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.