नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पदरात पडलेल्या निराशाजनक पराभवानंतर आज काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या ११ आमदारांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे सुपूर्द केल्याने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून आमदारांचा राजीनामा कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकासाठी धोक्याची घंटा समजला जात आहे.
तर दुसरीकडे, काँग्रेससाठी आज बिहारमधून एक चांगली बातमी आली असून नुकतेच काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले राहुल गांधी यांना पाटणा न्यायालयाने मानहानीच्या खटल्यामध्ये जमीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी “सगळे मोदी चोर असतात का?” असाही टिप्पणी केली होती. यावर बिहारचे उप-मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी तीव्र आक्षेप नोंदवत त्यांच्यावर मानहानीचा खटला भरला होता. मात्र आज या प्रकरणी राहुल गांधी यांना पाटणा न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.
कर्नाटकातील काँग्रेस आमदारांचा राजीनामा आणि राहुल गांधी यांना जमीन अशा दोन मोठ्या घटना एकाच दिवशी घडल्याने काँग्रेससाठी आजचा दिवस ‘कहीं ख़ुशी कहीं गम’ असाच ठरला आहे.