पुणे – कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदी याला पंजाब नॅशनल बॅंकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश शनिवारी येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिला आहे.
मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बॅंकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बॅंके दोन कर्मचाऱ्यांनी मोदी याला मदत केल्याचे निकालात नमूद आहे. मोदीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात पंजाब नॅशनल बॅंकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बॅंकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली.
तर मोदी याच्या वतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. त्यामुळे बॅंकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल 6 जुलै रोजी देण्यात येईल, असे स्पष्ट होते. त्यानुसार आज आदेश देण्यात आला. बॅंकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले होते. त्यापैकी पहिला दावा सात हजार कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा तीनशे कोटी रुपयांचा आहे, तर तिसरा दावा हा एक हजार 700 कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा निकाल झाला आहे.