पुणे – सर्वसामान्य नागरिकांची लाईफ लाइन असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेसमधून महिन्याकाठी शेकडो प्रवासी फुटचा प्रवास करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे महामंडळाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आता या प्रवाशांना रोखण्यासाठी राज्यभरात तीनशे कर्मचाऱ्यांची कुमक तैनात ठेवण्यात आली आहे.
प्रवाशांची संख्या वाढत असतानाच प्रशासनाचा महसूल दिवसेंदिवस अधिकच घटत चालला आहे. वास्तविक प्रशासनाच्या नियमानुसार फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी महामंडळाने प्रत्येक विभागात किमान चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक विभागात महामंडळाच्यावतीने अवघ्या दहा ते बारा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका विभागात किमान बारा ते तेरा डेपो आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रवाशांची आणि बसेसची तपासणी करताना या तिकीट तपासण्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच फुकट्या प्रवाशांना सवलत मिळणे अधिक सोपे झाले आहे. पण आता फुटक्यांना प्रवास करणे महागात पडणार आहे.
पदे रिक्त आणि पदोन्नत्याही रखडल्या
एसटी महामंडळाच्या नियमानुसार वाहक आणि चालकांनाही तिकिट तपासणीसांच्या पदावर पदोन्नती देण्यात येते, यासंदर्भात महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबधितांना वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील सर्व आगारांमधे शेकडो कर्मचारी सेवानिवृत्तीला आले असले तरी त्यांना अद्यापही या पदावर पदोन्नती देण्यात आलेली नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.
तिकीट तपासणीसांच्या ज्या जागा रिक्त आहेत. त्यासंदर्भात मुख्य कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून त्याला लवकरच यश येईल.
– यामिनी जोशी, पुणे विभागाच्या विभागीय नियत्रंक