पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातून 26 आणि मावळ मतदारसंघातून 28 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. गुरुवारी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. या दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी (दि.12) दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शिरूर आणि मावळ मतदारसंघातील निवडणुकीचे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.
शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (दि.9) अखेरची मुदत होती. या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गर्दी झाली होती. या दोन्ही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्याच दिवशी अर्ज भरले होते. छाननीमध्ये शिरूर मधून एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. दरम्यान, शुक्रवारपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी दि. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तर मतमोजणी दि. 23 मे रोजी होणार आहे.