पुणे – बोपोडी प्रभाग क्रमांक 8 मधील मानाजी बाग येथील कुंदन कुशलनगर (ए) बिल्डींगमधील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 2013 पासून या सोसायटीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय नेत्यांनी प्रचारासाठी इमारतीच्या आत प्रवेश करू नये, असे फलकच सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावले आहे.
महापालिकेकडूनच 2000 साली पूनर्वसन करण्यात आलेली ही इमारत असून 2013 पासून या सोसायटीला टॅंकरने पाणी सुरू आहे. तसेच सोसायटीच्या काही समस्या आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवकांसह आमदार तसेच खासदारांकडेही सोसायटींच्या नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यानंतरही या सोसायटीला पालिकेने पाणी टॅंकरनेच घ्यावे लागत आहे. तसेच, या सोसायटीत राहणाऱ्या 20 ते 22 कुटुंबांकडे सातत्याने प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आता सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच “पाणी नाही तर वोट नाही’ असे फलक लावले आहे. तसेच, आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सोसायटीत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे फलक सोशल मीडियावर चांगलेच व्हारल झाले असून हा विषय शहरात चर्चेचा बनला आहे.