जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम : विविध संघटनांकडून उपक्रम
पुणे – संपूर्ण विश्वाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान वर्धमान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था आणि संघटनांनी बुधवारी त्यांना अभिवादन केले. यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. भगवान महावीरांची शिकवण समाजात सर्व स्तरांपर्यंत रुजावी, असे मार्गदर्शन यावेळी मान्यवरांकडून करण्यात आले.
जैन सामूदायिक उत्सव समिती
श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर ते ओसवाल बंधू समाज कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे हे 67 वे वर्ष आहे. या मिरवणुकीमध्ये श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, दिगंबर जैन समाजासह विविध संस्था आणि महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. भगवान महावीरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मिरवणूकीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. मिरवणूकीमध्ये जैन सोशल ग्रूपच्या वतीने पाणी वाचवा अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. यांसह मतदान जागृतीविषयक पथनाट्य देखील यावेळी सादर करण्यात आले.
सत्ताविसा जैन सिटी ग्रूप
भवानी पेठ येथे ग्रूपच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुलोचना कोंढरे, पारसमल मुथ्था, विपीन मुथ्था, भरत सोळंकी आदी उपस्थित होते.
गुंदेशा बंधु जैन युवा मंच
महावीर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 200 पेक्षा अधिक पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. यावेळी मंचाचे सुभाष गुंदेशा, सुरेश गुंदेशा, भाग्यवंती गुंदेशा यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन श्वेतांबर राजस्थानी समाज ट्रस्ट आणि मनिष सोनिगरा मित्र परिवार ट्रस्टच्या वतीने राजस्थान भवनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गिरीश बापट, दिलीप कांबळे, मोहन जोशी, अजय भोसले, मनिष सोनिगरा आदी उपस्थित होते.
महावीर उत्सव समिती
समितीच्या वतीने कॅम्प परिसरामध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. माणिक भंडारी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शशिधर पुरम, ज्ञानेश्वर कांबळे, असिफ शेख, विनायक काटकर आदी उपस्थित होते.
संभवनाथ जैन युवक मंडळ
मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 500 जणांनी रक्तदान केले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले यांसह आदी नागरिक उपस्थित होते.