सुनील खैरनार यांची माहिती : कृषी सेवा विक्री केंद्रांची तपासणी
पुणे – खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा विक्री केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी 15 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात बियाण्यांचे एकूण 1 हजार 994 विक्रेते आहेत. तर खतांचे 2 हजार 200 आणि कीटकनाशकांचे 1 हजार 898 विक्रेते आहेत. या विक्रेत्यांमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात येते. या सर्व विक्रेत्यांकडील निविष्ठांचे नमूने घेऊन ते चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. त्यासाठी भरारी पथकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. कमी दर्जाच्या निविष्ठा आढळल्यास संबंधित विक्रेत्याचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात.
80 विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश
गतवर्षी बियाणांचे एकूण 746, खतांचे 1 हजार 165 तर कीटकनाशकांचे 460 नमूने तपासणीचे उद्दिष्ट पथकांना दिले होते. त्यापैकी बियाण्यांचे 681, खतांचे 942 तर कीटकनाशकांचे 446 नमूने घेतले गेले. त्यामध्ये बियाण्यांचे 11, खतांचे 90, कीटकनाशकांचे 23 नमूने अप्रमाणित आढळून आले होते. खरीप, रब्बी हंगामात दोन खत विक्रेत्यांचे तर तीन कीटकनाशक विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले. तसेच पाच बियाणे, 22 खते, 11 किटकनाशके व्रिकेत्यांवर न्यायालयीन दावे दाखल करण्यात आले. अप्रमाणित बियाणे विक्री करणारे 26, खते विक्री करणारे 33 आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्या 80 विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.