प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने प्रवाशांना आर्थिक फटका
पुणे – लग्नसराई आणि सुट्ट्या सुरू होताच खाजगी बसचालकांचा “भाव’ पुन्हा वाढला आहे. या बसचालकांनी गरजू प्रवाशांना अक्षरश: लुटण्यास सुरूवात केली असून किमान 25 ते 30 टक्के भाडे आकारणी केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला पुरेशी सेवा देण्यास एसटी महामंडळाला अपयश आल्याचे चित्र आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे भाडेवाढ न करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मात्र, वाढविलेल्या जादा बसेसची संख्या पुरेशी नसल्याने प्रवासी खाजगी बसेसकडे वळत आहे. त्याचाच गैरफायदा घेत या बसचालकांनी 25 ते 30 टक्के जादा भाडे आकारले जात आहे. एसटी महामंडळाची सेवा अपुरी असल्याने आणि हे बसचालक संघटित असल्याने प्रवाशांना नाईलाजाने या बसेसना जादा भाडे आकारुन प्रवास करावा लागत आहे. मात्र, त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असून संबधित विभागाने या खाजगी बसेसच्या चालकांच्या मनमानी भाडेवाढीला आळा घालावा, अशी मागणी अकोला येथील प्रवासी अभिजित शिंदे यांनी केली आहे.
सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. तरीही काही मार्गावर बसेसची संख्या कमी असल्यास त्या वाढविण्याच्या सूचना संबंधित आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
-यामिनी जोशी, पुणे विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.
नियमांची मोडतोड; तरीही भाडेवाढीचे समर्थन
खाजगी बसेसच्या आसनावर जागा नसल्यास थोडे कमी भाडे घेऊन गरजू प्रवाशांची चालकाच्या केबिनमधून अवैध वाहतूक सुरू आहे. मात्र, अशा बसेस अथवा मालकांवर एकही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. तर, “ही भाडेवाढ योग्यच आहे. इंधन आणि अन्य खर्चाच्या तुलनेत सध्याचे भाडे आम्हाला परवडत नाही,’ असा दावा संगमवाडी येथील खाजगी बसेसचे सेंटर चालक रफिक सय्यद यांनी केला.