पुणे – राज्यात सर्वत्र टॅंकरची मागणी वाढत आहे. या दुष्काळीपरिस्थितीत टॅंकरच्या होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच खरोखर तेवढ्याच पाण्याच्या फेऱ्या होतात का, याकडे देखरेख ठेवण्यासाठी टॅंकरला जीपीएस प्रणाली बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर टॅंकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी वितरण करण्यासाठी विहिरीत टाकण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. जेणेकरून पाण्याचा निचरा होणार नाही.
टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांना प्रत्यक्षात पाणीपुरवठा होतो किंवा नाही हे पाहाणे आवश्यक असल्याने त्यासाठी संबंधित गावाला टॅंकर उपलब्ध करून दिल्यानंतर गावातील 2 महिला सदस्यांची सही घेऊन त्याची नोंद वहीमध्ये करण्यात यावी. ही वही टॅंकरचालकाने टॅंकरसोबतच ठेवावी जेणेकरून नियमित व आकस्मिक तपासणीसाठी उपलब्ध होईल, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर टॅंकरमधून वाहतुकीदरम्यान पाणी गळणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. गळतीमुळे विहित प्रमाणापेक्षा कमी पाणीपुरवठा केल्यास अशा फेऱ्या ग्राह्य धरण्यात येऊ नयेत, असेही शासनाने म्हटले आहे.