दुसऱ्या गावांचा कचरा आमच्या गावात नकोची गावऱ्यांकडून भूमिका
खडकवासला परिसरातील गावांमधील कचऱ्याचा प्रश्न कायम
पुणे – खडकवासला परिसरातील गावांमधील कचऱ्याचा प्रश्न हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. याठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लागावी, यासाठी कचरा प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या गावांचा कचरा आमच्या गावात नको, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने कचरा प्रश्न सोडवायचा कसा? असा प्रश्न प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांना पडला आहे.
खडकवासला परिसरात असणाऱ्या विविध गावांमध्ये कचऱ्याचा प्रश्न ही एक गंभीर समस्या आहे. अनेकदा गावातील कचरा दिवसेंदिवस तसाच पडून असतो. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. मात्र, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. नुकतेच मिलिटरी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीने गाव दत्तक योजनेअंतर्गत या भागातील गावकऱ्यांशी भेट घेत, त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. परिसरात डोणजे, गोऱ्हेगाव बुद्रुक, गोऱ्हेगाव खुर्द अशी विविध 12 गावे आहेत. या गावांमध्ये कचरा गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळेच परिसरात कचरा ही एक मोठी समस्या बनत आहे. यावर उपाय म्हणून मिलिटच्या सहकार्याने याठिकाणी कचरा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास गावकऱ्यांकडून नकार देण्यात आला आहे.
प्रकल्प बंद पडण्याची भीती
याबाबत मिलिटचे प्रकल्प समन्वयक विंग कमांडर समीत वागळे म्हणाले, “गावकऱ्यांकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांकडून यासाठी नकार देण्यात आला आहे. आमच्या गावचा कचरा आम्ही जिरवू, मात्र इतर गावांचा कचरा आमच्या गावात आणू नका, असे मत गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.’ प्रशासनाच्या इतर कचरा प्रकल्पांप्रमाणे हाही प्रकल्प कधीतरी बंद पडेल आणि त्यामुळे गाव कचराकुंडी बनेल अशी भीती ग्रामस्थांना वाटत असल्याने त्यांच्याकडून नकार दिला जात आहे. मात्र, लवकरच या प्रश्नावर तोडगा काढून परिसरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचेही वागळे यांनी सांगितले.