पुणे – राज्यात मोठा गाजावाजा करत पशूगणनेला सुरुवात झाली. ही गणना टेक्नोसॅव्ही करताना अधिकाऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. मात्र, अद्याप पशुगणनेचे काम पूर्ण झाले नसल्याने सर्व गणनेचे काम पूर्ण झालेले नाही आहे. पुणे जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. दरम्यान, पुढील 13 दिवसांत पशुगणनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले.
यावेळी राज्यात पहिल्यांदाच पशुगणना टॅबवर करण्यात येत आहे. मात्र, सर्व्हरच्या अडचणींमुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गणना करताना अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकांमुळे पशुगणनेचे काम ठप्प झाले होते. सध्या पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. बारामतीमध्ये सध्या छावण्या सुरू होत असल्याने त्याठिकाणी जनावरांची पशुगणाना छावणीतच पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पशुगणनेचे काम पूर्ण केले असून, त्यांचा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे ते सर्व अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
पशुगणनेसाठी राज्य शासनाकडून आत्तापर्यंत अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम मुदत 31 मेपर्यंत आहे. त्यामुळे ज्या तालुक्यातील पशूगणना राहिली आहे. ती पुढील तेरा दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर आहे.