नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे सर्वाधिक घटना
घटना टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणार
पुणे – आग आणि अन्य आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याशिवाय नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यांना आग विझविण्याचे अथवा या घटना टाळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, या घटना कमी होण्याऐवजी वाढ होत आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत शहर आणि उपनगरांमध्ये अशा प्रकारच्या आग आणि आपत्तीच्या तब्बल सहा हजाराहूनही अधिक घटना घडल्या आहेत.
शहर, उपनगर आणि जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत मोठ्या प्रमाणावर कारखानदारी वाढली आहे. ही कारखानदारी वाढल्याने त्या भागांतील नागरीकरणातही वाढ झाली आहे. त्यामध्ये परप्रांतीय कामगारांचा मोठा समावेश आहे. विशेष म्हणजे बहुतांशी घरांच्या विद्युत यंत्रणा सक्षम नसल्याने आणि त्यांचे वायरिंग व्यवस्थित नसल्याने आतापर्यंतच्या बहुतांशी घटना या शॉर्टसर्किटमुळे घडल्या आहेत. त्यासंदर्भात आतापर्यंत अनेकवेळा या घर मालकांना समज देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यामध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन आगीच्या आणि आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मत अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.