एकाच परिमंडलामध्ये नियुक्त करण्यास प्रशासनाचा हिरवा कंदील
पुणे – एकाच नोकरीत असूनही वर्षानुवर्षे वेगवेगळ्या विभागात अथवा परिमंडलात नोकरी करणाऱ्या जोडप्यांना दिलासा देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. या जोडप्यांची एकाच परिमंडलामध्ये नियुक्ती करण्यास प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्याची अंमलबजावणी याच महिन्यापासून करण्याच्या सूचना मुख्य कार्यालयाने दिल्या आहेत. या निर्णयाचा तब्बल बाराशे जोडप्यांना लाभ होणार आहे.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीजकंपन्यांच्या प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धोरण ठरविले आहे. या धोरणानुसार त्यांना अन्य कंपन्यांमध्ये बदली मागता येत नाही. मात्र, एकाच कंपनीमध्ये पती आणि पत्नी काम करत असल्यास त्यांना एकाच परिमंडलामध्ये नियुक्ती देण्यात यावी, असा नियम करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही नियमावली राज्य शासनाच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत महावितरण प्रशासनानेच या नियमांना हरताळ फासला आहे. या कालावधीत तब्बल बाराशे जोडप्यांनी विनंती अर्ज प्रशासनाला दाखल केले आहेत. त्यांनी महावितरण प्रशासन आणि राज्य शासनाकडे पाठपुरावाही केला आहे. असे असतानाही त्याबाबत अद्याप सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
यासंदर्भात दैनिक “प्रभात’च्याने 11 मेच्या अंकामध्ये वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत या जोडप्यांची एकाच परिमंडलामध्ये नियुक्ती करण्याच्या सूचना मुख्य कार्यालयाने दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची या वर्षीपासूनच अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे विभक्त राहणाऱ्या जोडप्यांना दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणिस कृष्णा भोयर म्हणाले, संघटनेच्या वतीने यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत होता. प्रशासनाने उशीरा का होइना पण याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्याचा निश्चितच फायदा एकाच कंपनीमध्ये काम करणाऱ्या जोडप्यांना होणार आहे.