त्याचा परिणाम केवळ शारीरिक, मानसिक नव्हे, तर कुटुंबावरही
पुणे – वायू आणि ध्वनिप्रदूषणाचा थेट परिणाम जसा वाहन चालवणाऱ्यांवर होतो. त्यापेक्षा कैकपटीने जास्त परिणाम वाहतूक पोलिसांवर होतो. पोलिसांना यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. परंतु मुळातच वायूप्रदूषण रोखणे अधिक महत्त्वाचे असून, ती जबाबदारी प्रत्येकाचीच आहे.
वाहतूक पोलिसांची जवळपास दरवर्षीच फुप्फुसांची कार्यक्षमता तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात येते. कर्तव्य बजावत असताना सतत प्रदूषणाचा सामना करावा लागतो. वाहनांचा धूर, धूळ याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असतो. यामुळे अनेकांना प्रकृतीचे गंभीर आजार उद्भवतात. मात्र त्यानंतरही किरकोळ त्रास समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र या धूळ आणि प्रदूषणाचा शारीरिक आणि मानसिक परिणाम तर होतोच परंतु कौटुंबीक स्वास्थ्यावरही त्याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत आहे.
चौकातच वायूप्रदूषणाची पातळी
सर्वोच्च असते त्यामुळे श्वसनाचे, छातीचे रोग, न्युमोनिया, दमा या सारख्या रोगांचा सामना वाहतूक पोलीसांना करावा लागतोच. याशिवाय रस्त्यांवर वाजणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही विपरित परिणाम होतो.
काही स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीनुसार वाहतूक नियमन करणाऱ्या जवळपास 35 टक्के पोलिसांची श्रवणशक्ती कमी होते. त्यामुळे औषधोपचार यावर लागू होत नाहीत, काही वर्षांनी हा परिणाम वाढत जाऊन श्रवणयंत्र लावणे हा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे राहतो.
या परिणामामुळे त्याची चिडचिड वाढते. त्याचा परिणाम कौटुंबिक स्वास्थ्यावर होतो. ते बिघडले की बहुतांश पोलीस कर्मचारी व्यसनाचा मार्ग चोखाळतात. यामध्ये केवळ मद्यच नव्हे, तर तंबाखू आणि अन्य व्यसनांच्या आहारी ते जातात. एका चौकात एका पोलीस कर्मचाऱ्याने सहा महिने ड्युटी करण्याचा एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्याला याचा जास्त त्रास होणार आहे.
उपाययोजना काय?
पोलिसांना मास्क देणे, आरोग्याची काळजी घेताना वार्षिक तपासणी करणे हे प्रयोग राबवले जातात. परंतु मुळातच प्रदूषण कमी करण्याकडे लक्ष दिले जात नाही. हे सजग नागरिकांच्या हातात आहे. आपणच वायू प्रदूषण वाढवण्याला कारणीभूत आहोत, हे प्रत्येक वाहनचालकाला समजणे आवश्यक आहे. सिग्नलला थांबल्यावर वाहन बंद करणे हा त्यातल्या त्यात एक उपाय यामध्ये होऊ शकतो. याशिवाय बिघडलेले, काळा धूर ओकणारे वाहन स्क्रॅप करणे, ते न वापरणे, वाहनांची नियमित सर्व्हिसिंग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शक्य तेथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे मात्र याकडे बहुतांशवेळा दुर्लक्ष केले जाते.
वायू आणि ध्वनिप्रदूणाचा पोलीसांवरील परिणाम अत्यंत घातक आहे. त्यातल्या त्यात उपाय म्हणून एका पोलिसाला एकाच चौकात रोजची ड्युटी असू नये, असे आम्ही सुचवले आहे. एखादा गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसाने एक दिवस नियमन केले, तर दुसऱ्या दिवशी त्याला कमी गर्दीच्या ठिकाणी ड्युटी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा त्यातल्या त्यात कमी परिणाम होऊ शकेल.
– डॉ. मिलिंद भोई, “विघ्नहर्ता न्यास, पुणे पोलीस’.