पुणे .- आचारसंहिता काळात 50 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम बाळगण्यास निवडणूक आयोगातर्फे मनाई करण्यात आली आहे. कोणाकडे 50 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम सापडल्यास संबंधितांची चौकशी केली जाणार आहे.
जिल्ह्यात दोन टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे व बारामती मतदारसंघासाठी दि.23 एप्रिल रोजी तर शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी दि.29 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदारांना पैशांचे प्रलोभन देण्यासाठी प्रयत्न केले जातात. पैशांचे हस्तांतरण, दळणवळण सुरू असते. यावर खबरदारी म्हणून निवडणूक आयोगाने आयकर विभागाला विशेष आदेश दिले असून, भरारी पथकेदेखील नेमली आहेत. तसेच दहा लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार अचानकपणे होत असल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याच्या सूचना बॅंकांना दिल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात आचारसंहितेच्या काळात दहा लाखांपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद हस्तांतर झाल्याचे व्यवहार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. त्यानुसार संबंधितांची चौकशी सुरू आहे.
निवडणूक विभागाने अशा व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले असताना 50 हजारांची रोकड बाळगताना आढळल्यास संबंधितांची चौकशी केली जाणार आहे. परंतु, सबळ पुराव्यांसह समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.