पुणे – पालखी सोहळ्यानिमित्त दोन दिवस शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी महापालिकेची सर्व सुलभ स्वच्छतागृहे मोफत ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबच्या सूचना देण्यात आल्या असून या कालावधीत या स्वच्छतागृहांची स्वच्छता दिवसातून तीन वेळा केली जाणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे पुण्यात दि.26 जून रोजी आगमन होत आहे. दि.27 रोजी त्यांचा मुक्काम असून, दि.28 जूनला पहाटे दोन्ही पालख्या पुढील मुक्कामासाठी प्रस्थान ठेवतील. पुण्यात दिंड्या आल्यानंतर वारकरीबांधव मध्यवस्तीसह शहराच्या विविध भागात मुक्कामी असतात. महापालिकेच्या शाळांमध्येही त्यांच्यासाठी सुविधा केलेली असते. या काळात शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. त्यावर आतापासून नियोजन सुरू आहे. दरम्यान, वारकऱ्यांना नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशी आहे तयारी
घनकचरा विभागाकडून पालखीच्या कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन शिफ्टमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज उतरविणार येणार आहे. पालखी सोहळा पुण्यात आल्यापासून तो शहराबाहेर जाईपर्यंत सतत स्वच्छता केली जाणार आहे. दोन्ही पालख्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये मुक्कामी असतात. त्यासाठी या भागासाठी अतिरिक्त 140 कर्मचारी स्वच्छतेसाठी दिले आहेत. शहरातील 1,500 पैकी सुमारे 300 स्वच्छतागृहे हे सशुल्क आहेत. दि.26 आणि 27 जूनला याठिकाणची सेवा निःशुल्क असणार आहे. तशा सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. आषाढी वारीनिमित्त स्वच्छतेसाठी महापालिकेचे 100 कर्मचारी पंढरपूर येथे जाणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.