पुणे – पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या नियोजनात शहरातील तलाव तसेच नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाला गेल्या पाच दिवसांपासून धरणातून मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वाहून आलेली जलपर्णीही काढता येत नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाकडून बुधवारपासून नदीपात्रात वाहून आलेली केवळ 20 टक्के जलपर्णी काढण्यात आलेली असून ही काढलेली जलपर्णीही नदीच्या कडेला पुन्हा नदीपात्रात पडेल अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे.
मागील आठवड्यात शहरात झालेल्या पावसाने मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यातच, धरणातून पाणीही सोडण्यात आलेले होते. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीबाहेरील जलपर्णी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात वाहून आली असून वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटजवळील छोट्या पुलाला ही जलपर्णी अडकून पडली आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून क्रेन आणि जेसीबी लावण्यात आली होती. मात्र, हे कर्मचारी एका बाजूची जलपर्णी काढून दुसऱ्या बाजूला टाकत असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाकडून हे काम थांबविण्यात आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांपासून हीच यंत्रणा लावून जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, त्यानंतर ही काढलेली जलपर्णी उचलून इतरत्र टाकणे आवश्यक असल्याने हा ढीग पुन्हा आहे तसा नदीपात्राच्या कडेला ठेवण्यात आला आहे. त्यातच, शनिवार आणि रविवार जोडून सुट्ट्या आल्याने हे कामच पालिकेने बंद ठेवले आहे. या साचलेल्या जलपर्णीमुळे आता या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असून या जलपर्णीत मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने दुर्गंधीही पसरलेली आहे. त्यामुळे एका बाजूला कोट्यवधींचा चुराडा करून जलपर्णी काढण्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाला वाहून आलेली जलपर्णीही उचलता येत नसल्याने महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांच्या तयारीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.