80 हजारांहून अधिक ग्राहकांकडून आंब्यांची खरेदी : सुनील पवार यांची माहिती
पुणे – उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून राज्य कृषी पणन महामंडळाच्यावतीने गेले दोन महिने राबविण्यात आलेल्या आंबा महोत्सवात सुमारे 14 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. त्याचबरोबर तब्बल 80 हजारांहून अधिक ग्राहकांकडून आंब्यांची खरेदी झाली असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
मंडळाकडून दरवर्षी मंडळाच्या मुख्यालयाजवळ आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो. मात्र, प्रशस्त जागेमुळे यंदा पहिल्यांदाच मार्केट यार्डातील भुसार बाजारच्या गेट क्रमांक 9 च्या पीएमटी बस डेपो शेजारी हा महोत्सव सुरु झाला. कोकणातील दर्जेदार हापूस आंब्यांच्या खरेदीत पुणेकर ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे उलाढाल वाढण्यास मदत झाली, असे ही त्यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख आणि कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ कोत यांच्या संकल्पेनेतून राज्यात 25 ठिकाणी आंबा महोत्सवाचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये पुणे ,नाशिक ,सांगली, सोलापूर औरंगाबाद, बारामती, इंदापूर शिरुर या शहरांमध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले तर कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड लातूर अकलूज, पनवेल, भिवंडी, वसई येथील आंबा महोत्सव अंतिम टप्यात आहेत.
पुण्यातील विविध उपनगरांसह राज्यात 24 ठिकाणी पाच दिवशीय आंबा महोत्सव भरविण्यात आलेले आहेत. महोत्सवात हापूस, केशर आणि वनराज या जातीच्या आंब्याची विक्री होत आहे.
राज्यात सुरु असलेल्या महोत्सवातून सुमारे 4 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी व्यक्त केली. यंदाच्या हंगामात प्रति डझन 700 ते 900 रुपये असणारा भाव 20 मे नंतर आवक वाढल्यानंतर 400 ते 600 रुपयांपर्यंत खाली आला तर अंतिम टप्यात सध्या 200 ते 400 रुपये डझन असे भाव असल्याचेही त्यांनी
सांगितले.
7 जूनपासून जुन्नर, आंबेगावमध्ये आंबा महोत्सव
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पर्यटनास चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आंब्यास चांगला भाव मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दि. 7, 8, 9 आणि 15, 16 जून रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे उपस्थित होते.या महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना जयस्वाल म्हणाले, जुन्नर तालुक्यातील येणेरे, पारंडे आणि निरगुडे तर आंबेगाव तालुक्यातील गिरवली, पिंपळगाव, सुपेधर, शिनोली आणि गंगापूर या आठ ठिकाणी आंबा महोत्सव होणार आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे या भागातील विविध आंब्याचा आकार, रंग, सुगंध, चव ही वैशिष्ट्य कोकणपेक्षाही थोडी वेगळी आहेत. येथील प्रदूषणमुक्त वातावरण, नैसर्गिकरित्या घेतलेले उत्पादन, जमीन आणि पाणी हे यामागील प्रमुख कारण आहे. फळांवर नैसर्गिक मऊसर मुलामा, पातळ साल, आकाराने पातळ, लहान कोय, याबरोबरच आंबटगोड चव ही आंब्याची वैशिष्ट्ये आहेत; परंतु या आंब्यांबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात पर्यटकांना आंब्यांची बाग कशी असते. शेतकरी कसे उत्पादन घेतात. याची माहिती देण्यात येणार आहे.