जिल्ह्यात टॅंकरचा आकडा 310 वर : साडेपाच लाख नागरिकांना पाणीपुरवठा सुरू
पुणे – जून महिना निम्मा संपत आला तरीही जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी दिवस-रात्र टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यातच मान्सूनचे आगमन कधी होणार? या महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल का? याची शाश्वती नाही. त्यामुळे टॅंकरचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तब्बल 310 टॅंकरद्वारे 200 गावे आणि दीड हजारांहून अधिक वाड्या-वस्त्यांवरील साडेपाच लाख नागरिकांची तहान भागविली जात आहे. जून महिना अखेरपर्यंत टॅंकरची संख्या 300 पर्यंत जाईल, अशी शक्यता जिल्हा पाणीपुरवठा विभागाकडून दर्शविण्यात आली होती. मात्र, जूनच्या पहिल्याच आठवड्यात टॅंकरने अपेक्षेपेक्षाही पुढे मजल मारली आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत 350 च्या वर टॅंकर संख्या जाईल. त्यावरून जिल्ह्यातील पाण्याच्या टंचाईची भीषणता दिसून येते. त्यामुळे शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहे.
इंदापुरात सर्वाधिक टॅंकर
इंदापूर तालुक्यात टॅंकरने हाफ सेन्च्युरी मारली असून चार दिवसाला दोन ते तीन टॅंकरची वाढ होत आहे. 1 लाख 3 हजार बाधित लोकसंख्येला 50 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातही टॅंकरची संख्या झपाट्याने वाढली असून 44 टॅंकरद्वारे 153 वाड्यावरील 90 हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. बारामती तालुक्यातील 330 वाड्या-वस्त्या आणि 26 गावांना 42 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच पुरंदर तालुक्यात 31, दौंडमध्ये 30, आंबेगाव येथे 29, जुन्नरमध्ये 27 तर खेडमध्ये 23 टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे.