पुणे – अधिकारी अथवा कामगारांच्या बदल्या करताना त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विनंती बदल्यांचा अर्ज “एम्प्लॉय पोर्टल’ वरूनच करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व परिमंडलांसाठी परिपत्रक जारी केले आहे. त्याची या वर्षापासूनच अंमलबजावणी होणार आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी 20 मे ही अंतिम तारीख आहे.
काही अपवाद वगळता महावितरण प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होतात. त्यासाठी यापूर्वी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने साध्या कागदावर अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र, या बदल्या करताना अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची कुंडली तपासता येत नव्हती. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचे काम चांगले नसले तरी तो बदलीस पात्र ठरविण्यात येत होता. त्यामुळे अन्य प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. त्यासंदर्भात अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी ” एम्ल्पॉय पोर्टल’ तयार केले आहे. यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नोकरीतील सर्व कामाची आणि वैयक्तिक माहिती अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे ही बदली मंजूर करताना या पोर्टलचा आधार घेण्यात येणार आहे. ते तपासूनच ही बदली करायची अथवा नाही, बदली कोणत्या परिमंडलात आणि कोठे करायची याचा निर्णय संबंधित विभागाच्या वतीने घेण्यात येणार आहे.