पुणे – शहरातील रस्त्यांवर धावणारे गळके टॅंकर अपघातांना कारणीभूत ठरत असल्याची बाब प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) निदर्शनास आली आहे. शहरातील काही भागांमध्ये महापालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारे बहुतांश टॅंकर गळके असून रस्त्यावर पाणी सांडत जात आहेत. त्यामुळे रस्ते ओले होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेऊन आरटीओ कार्यालयाने गळक्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करू नये, अशी सूचना महापालिकेला केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवत नसल्या तरी उपनगरांमध्ये जाणवू लागली आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून टॅंकरद्वारे या भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, महापालिकेकडून पाणीपुरवठा करणारे बहुतांश टॅंकर गळके असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा करताना या टॅंकरमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी सांडते. पाण्यामुळे रस्ते ओले होऊन दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. या प्रकारामुळे एखादा मोठा अपघात होण्याचीही शक्यता आहे. ही बाब आरटीओ प्रशासनाच्या निदर्शनास आल्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून महापालिकेला गळक्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात लवकरच महापिलका आयुक्तांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.