मंचर (प्रतिनिधी) :- जांभोरी (ता. आंबेगाव) येथील काळवाडी वस्तीच्या वरील बाजूस डोंगरात भेगा पडल्याच्या दिसत असून येथील कुटुंबे भीतीच्या सावटाखाली आहेत. या ठिकाणी सतत पाऊस सुरू असल्याने कधीही दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे आमची इर्शाळवाडी होऊन देऊ नका, आमचे लवकरात लवकर पुनर्वसन करून आम्हाला पक्की घरी द्यावीत, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
माळीण घटनेच्या वेळी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या आंबेगाव तालुक्यातील काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी), मेघोली (माळीण), पसारवाडी, भगतवाडी (फुलवडे) या पाच गावांमध्ये अद्यापही संरक्षक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. माळीण दुर्घटना घडली त्यास नऊ वर्षे झाली तरीही प्रशासनाला जाग आलेली नसून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक गावे भीतीच्या सावटाखाली आहेत.
जांभोरी येथे काळवाडी ही वस्ती डोंगराच्या खालील बाजूस असून, येथे पस्तीस कुटुंब वास्तव्यास आहेत. ज्यावेळी माळीणची घटना घडली त्यावेळेस वाडीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, अद्यापही येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. वाडीच्या वर असलेल्या डोंगराला भेगा पडल्या असून, डोंगरावर मोठ मोठे दगड आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कधीही दगड खाली येऊन दुर्घटना घडू शकते.
राजकीय नेते मंडळी दरवर्षी पावसाळ्यात येतात, पाहणी करतात. मात्र, पावसाळा संपला की त्यांना येथील नागरिकांचा विसर पडतो. सरकार व प्रशासन दुसरी माळीण झाल्यावरच उपाययोजना करणार का, असा संतप्त प्रश्न जांभोरी येथील काळवाडीतील ग्रामस्थांनी केला आहे.