वाल्हे (प्रतिनिधी) : वाल्हे (ता.पुरंदर) येथील श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी विवाह सोहळा वाल्हे पंचक्रोशीची अष्टमी अशी परंपरा असलेली याञा कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे या वर्षी रद्द करण्यात आली. गावच्या याञेनिमित्त १४ एप्रिल पासून ते १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणारे सर्वच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
१४ एप्रिल रोजी श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरीचा विवाह सोहळा मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी फेसबुक लाईव च्या माध्यमातून अनेक ग्रामस्थांनी अक्षदांचा वर्षाव ग्रामदैवतावर केला. याञेनिमित्त छबीना, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्या ,तसेच देवाची वरात आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून मंदिर परिसरामध्ये कोणीही गर्दी करू नये. देवस्थान ट्रस्ट व तसेच पोलिस प्राशासनाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आव्हान पुणे जिल्हा बॅकेच माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी केले आहे.