घाऊक बाजारात 15 दिवसांत 20 रुपयांनी वाढ : नेहमीच्या तुलनेत उत्पादन निम्मे झाल्याचा परिणाम
पुणे – मसाल्याच्या पदार्थामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या धन्याच्या उत्पादनावर दुष्काळाचा फटका बसला आहे. निम्म्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे धन्याच्या भावात मार्केट यार्डातील भुसार बाजारात पंधरा दिवसात किलोमागे 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली असलाची माहिती व्यापारी राजेश गुगळे आणि सोपान राख यांनी दिली.
देशात केवळ मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यातच धन्याचे उत्पादन घेतले जाते. तेथून संपूर्ण देशात धन्याची निर्यात होते. मात्र, यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे तिन्हीही राज्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, संपूर्ण देशातच धन्याची कमी निर्यात होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे भावात वाढ झाली आहे. शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील मसाले व्यावसायिक, पावडरवाल्यांकडून विशेषत: धन्याला जास्त मागणी आहे. याबरोबरच कोथिंबिरीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून मागणी आहे. त्यामुळे भावात वाढ झाली असून, भावात तेजी राहण्याची शक्यता राख यांनी वर्तविली आहे.