जैवविविधतेवरही परिणाम : तातडीने बंदोबस्त करण्याची वृक्षप्रेमींची मागणी
पुणे – शहरातील राखीव वने आणि टेकड्यांच्या परिसरात घातक परदेशी वनस्पतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी या परिसरांमध्ये लावण्यात आलेल्या रोपांवर परिणाम होत असून, रोपे जळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण वृक्षप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांकडून नोंदविण्यात आले आहे.
शहरातील विविध परिसरांमध्ये विशेषत: टेकड्यांच्या परिसरात परदेशी उपद्रवी वनस्पतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वनस्पतींमुळे जैवविविधतेवर परिणाम तर होतच आहे, शिवाय लागवड केलेली रोपे मरून जाण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. या उपद्रवी वनस्पतींमध्ये रानमारी, टणटणी (घाणेरी), उंदीरमारी (ग्लिरीसीडिया), सुबाभूळ , ऑस्ट्रेलियन बाभूळ, एरंड, कॉसमॉस (सोन कुसुम), धनुरा (गाजर गवत किंवा चटक चांदणी), चिमुक काटा, टेकोमा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे.
या वनस्पतींचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने महापालिकेकडे आणि वनविभागाकडे केली आहे.
याबाबत वनस्पती अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर म्हणाले, “परदेशी उपद्रवी तणे-वृक्ष, वन व जल परिसंस्थांचा समतोल बिघडवतात, स्थानिक वनस्पती नष्ट करतात. पिकांचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरतात. तसेच तणांद्वारे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होतो. जल-तणांमुळे डासांची अपरिमित वाढ होते, त्यामुळे भयंकर आजार होतात. त्यावर उपाय म्हणून आपण परदेशी वनस्पती, तणे नष्ट करायला हवी.’