राज्य सरकारने सुवर्णमध्य साधत मार्ग काढणे आवश्यक
गुणवत्तेत तफावत : महाविद्यालयातच पूर्ण व्हावी सीईटीची तयारी
पुणे – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयबरोबर कोचिंग क्लासेसचे “टायअप’ करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याचप्रमाणे बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीचे महत्त्व वाढले आहे. क्लासेला व न जाणारी अशा विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेत तफावत दिसून येत आहे. हे सर्व टाळण्यासाठी महाविद्यालयातच सीईटीची तयारी करून घ्यायला हवी, तरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येण्याची चिन्हे आहेत.
सध्या बारावी निकालापेक्षा विद्यार्थी व पालकांचे सीईटीच्या गुणांकडे लक्ष लागले आहे. कारण बारावीत कितीही गुण पडले, तरी सीईटीत चांगले गुण प्राप्त करणे, हेच विद्यार्थ्यांचे प्राधान्य राहिले आहे. सीईटीच्या वाढत्या महत्त्वामुळे क्लासेसकडे विद्यार्थी मोठ्या संख्येने पसंती देत आहेत. क्लास लावला तरच सीईटी चांगले गुण मिळू शकतील, असा पालकांचा समज झाला आहे. ही मानसिकता ओळखून क्लासेसचे मोठे प्रस्थ वाढले आहे. त्यातून क्लासेससाठी लाखो रुपये शुल्क देण्यासाठी पालकांची तयारी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच विद्यार्थ्यांना सीईटीत चांगले गुण मिळविण्यासाठी संबंधित महाविद्यालयाने पुढाकार घेतल्यास, ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. सीईटीची तयारी महाविद्यालयस्तरावर घेतल्यास, सीईटीसाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच उंचावेल. त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक अथवा महाविद्यालयातील शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविली, तर त्यातून चांगले निकाल हाती येण्याची शक्यता आहे. ही पद्धत महाविद्यालयाने राबविल्यास खासगी क्लासेसचे महत्त्व आपोआप कमी होईल. त्यातून विद्यार्थ्यांचे लाखो रुपये शुल्कही क्लासेससाठी भरावे लागणार नाही. मात्र, त्यासाठी राज्य सरकारने सुवर्णमध्य साधत मार्ग काढणे आवश्यक आहे.