बंदोबस्तासाठी एसआरपीएफची मदत : काम थांबविणाऱ्यांवर करणार थेट फौजदारी
पुणे – गेल्या दोन महिन्यांपासून प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. हे काम सुरू करण्यासाठी पोलिसांनी थेट राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) अतिरिक्त बंदोबस्त मागविला आणि पोलीस आणि एसआरपीएफच्या संयुक्त बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच हे काम बंदोबस्तात सुरू केल्यानंतर कोणी विरोध केल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 400 कोटी रुपये खर्चून महापालिकेकडून हा प्रकल्प राबविण्यात येत असून प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
आयुक्त राव म्हणाले, भामा-आसखेड काम शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्रकल्पग्रस्तांना दिलेला इशारा लक्षात घेऊन याठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सीआरपीएफच्या दोन तुकड्या बोलविण्यात आल्या असून त्या सायंकाळपर्यंत पोहोचणार होत्या. त्यामुळे शुकवारपासून कामाला सुरवात करण्याचे नियोजन करण्यात आले. काम सुरू करण्यासाठीच्या मशीनरीही मुंबईवरून आणण्यात आल्या आहेत. तसेच, हे काम रोखण्यासाठी जे कोणी विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
मोबदला देण्याचे कामही सुरू
प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याच्या विषयावर भामा आसखेड योजनेचे काम मार्च महिन्यांपासून बंद आहे. प्रकल्पग्रस्तांनीच हे काम बंद पाडले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने काम सुरू करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळू शकला नव्हता. मात्र, त्यापूर्वीच राज्य शासनाने दोन्ही महापालिकांचा सिंचन पुन:र्स्थापना खर्च माफ करत महापालिकांनी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारी प्रति हेक्टरी 15 लाख मोबदला देण्याची सूचना केली असून महापालिकांकडून त्यासाठीचा निधीही जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासोबत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.