पुणे – मुसळधार पावसामुळे सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. सोमवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहचली असून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
या घटनेत राधेलाल पटेल(25), जेटू लाल पटेल (50), ममता राधेलाल पटेल (22), जितू चंदन रवते (24), जेटूलाल पटेल(45), ममता पटेल (24) अशी मयतांचे नावे आहेत.
सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही सीमाभिंत आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नवीन बांधकाम झाले होते. इमारतीच्या आवारातच भिंतीच्या बाजूला सुमारे 12 झोपड्या होत्या. त्यातील 3 ते 4 झोपड्यावर ही भिंत कोसळली. दरम्यान, महापालिकेकडून तातडीनं शहरातील सर्व धोकादायक लेबर कॅम्प हलविण्याचे आदेश शहर अभियंता वाघमारे यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.
तत्पूर्वी, कोंढवा परिसरामध्ये अल्काॅन सोसायटीची संरक्षक भिंत ढासळल्याने गंभीर दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत कामगारांच्या झोपड्यांवर संरक्षक भिंतीचा मलबा पडल्याने १५ मजुरांचा मलब्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला होता.