पुणे – गत आठ महिन्यांत 72 हजार 690 समस्या असलेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यास भेट दिली. “सेवा’ ऍप प्रणालीच्या नियंत्रण कक्षातून त्यापैकी 50 हजार 702 जणांना कॉल करण्यात आला. त्यातील तब्बल 50 हजार 294 नागरिकांनी पोलिसांबद्दल समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली. समस्या न सुटल्याने 408 नागरिक असमाधानी असून त्यांच्याही समस्या लवकरच वरिष्ठ पातळीवर सोडविण्यात येतील, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.
विविध अडीअडचणी आणि समस्या घेऊन नागरिक पोलीस ठाण्यात येतात. मात्र, अनेकदा त्यांच्या समस्येचे समाधान होत नाही. “पीडितांची सेवा, श्रेष्ठ सेवा’ हे वाक्य प्रमाण माणून आठ महिन्यांपूर्वी सेवा’ (सर्व्हिस एक्सलन्स ऍन्ड व्हिक्टिम असिस्टन्स) ही प्रणाली विविध पोलीस ठाणे आणि शहरातील 102 चौक्यांमध्ये राबविण्यात आली. यामध्ये पोलीस ठाण्यात “सेवा’ ऍप देण्यात आले आहे. हे पोलीस कर्मचारी तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचे स्वरूप, त्याचा फोटो, मोबाइल क्रमांक, पत्ता आणि त्याला कोणाला भेटायचे आहे ही माहिती नमूद करण्यात येते. त्यानंतर काही दिवसांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून संबंधित तक्रारदार नागरिकांना कॉल करून तक्रार निवारण झाले आहे की नाही याबाबत विचारणा करण्यात येते. तसेच तो असमाधानी असेल तर त्याल योग्य ते मार्गदर्शन करण्यात येते.
शहरातील पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या 102 पोलीस चौक्यांमध्येही एप्रिल 2019 पासून सेवा टॅबचे वाटप करण्यात आले आहे. तेथेही ही कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 100 टक्के ठाण्यात भेट देणाऱ्या सर्वच नागरिकांना कॉल करण्यात येतो. ज्या नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे. त्यातील बहुतेकांचे प्रश्न पोलीस प्रशासनाशी संबंधित नाहीत ते तहसील अथवा इतर प्रशासकीय विभागांशी संबंधित आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.