12 तालुक्यांत दुष्काळाची भीषणता
सव्वातीन लाख नागरिक पाण्यावर अवलंबून
सर्वाधिक टॅंकरसंख्या बारामती तालुक्यात
पुणे – जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे. मावळवगळता अन्य 12 तालुक्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज तब्बल 40 लाख 4 हजार लिटर पाणी दुष्काळग्रस्त गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पुरविले जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील धरणातून एकीकडे सातत्याने होणाऱ्या विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे टॅंकरच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत टॅंकरने 200 चा आकडा पार केला असून, 118 गावे 1 हजार 5 वाड्या वस्त्यांवरील 3 लाख 23 हजार 479 नागरिकांची तहान टॅंकरद्वारे भागविली जात आहे. एप्रिल महिन्यातील कडका उन्हाच्या चटक्याने भोर आणि मुळशी तालुक्यातही टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. दुष्काळाची तिव्रता दिवसेंदिवस तिव्र होत असून गेल्या दोन दिवसांत टॅंकरची संख्या 16 ने वाढली आहे. बारामतीमध्ये पाण्याचे मोठे दुर्भीक्ष्य असल्याने सध्या सर्वाधिक 37 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, पुरंदर आणि शिरूर तालुक्यातही पाण्याची भिषण परिस्थिती आहे. दुष्काळीजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखड्यातील कामांना प्राधान्य दिले. 15 मेपर्यंत नळपाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.