कारखान्यांवर आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा
पुणे – राज्यात गळीत हंगाम संपला असला तरी अद्याप ही साखर कारखान्यांकडे 1436.77 कोटी रुपयांची “एफआरपी’ची थकबाकी आहे. ज्या कारखान्यांनी अद्याप ही थकबाकी दिलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात यंदा विक्रमी गाळप झाले आहे. यंदाच्या हंगामात सुमारे 195 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. या कारखान्यांनी सुमारे 952.11 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले त्यातून सुमारे 1032 लाख मेट्रीक टन साखरचे उत्पादन झाले आहे. उस गाळप झालेल्या टनावर शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात येते. यंदा तब्बल 23 हजार कोटी रुपयांची “एफआरपी’ची रक्कम होती. त्यापैकी 21 हजार 604 कोटीची “एफआरपी’ शेतकऱ्यांना मिळाली आहे तरी अजूनही 1436 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी त्वरित मिळावी यासाठी आता साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
राज्यात 100 टक्के एफआरपी अदा केलेल्या कारखान्यांची संख्या ही 93 इतकी आहे तर 80 ते 99 टक्केपर्यंत रक्कम अदा केलेल्या कारखान्यांची संख्या ही 66 इतकी आहे तर 60 ते 79 टक्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ही 25 इतकी आहे. 00 ते 69 टक्यापर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या 11 आहे. ज्या कारखान्यांनी शून्य टक्के एफआरपी दिलेली आहे. त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत अशाप्रकारे 73 कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
यंदा पहिल्यांदाच कारखान्यांनी एफआरपीची 94 टक्के रक्कम अदा केली आहे. काही कारखान्यांनी टप्याने एफआरपी देण्याचे मान्य केल्याने थकीत आकडेवारी जास्त दिसत आहे. गाळप हंगामाच्या सुरुवातीपासून कारखान्यांवर एफआरपीसाठी दबाव टाकण्यात आल्याने तसेच शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला आहे.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त