कृषी विभागाची तयारी : अंदाज 2 लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज
पुणे – पावसाला अजूनही दीड महिना अवकाश आहे. त्यामुळे यंदा पुरेशा पावसाची अपेक्षा व्यक्त करत शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे यासाठी कृषी विभागाने आतापासून तयारी केली आहे. त्यासाठी बियाणे आणि खते वेळेत मिळण्यासाठी उपाययोजना केली असून, यावर्षी खरीप हंगामासाठी जवळपास 26 हजार 573 क्विंटल बियाणांची मागणी आहे, तर 1 लाख 670 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गतवर्षीचा अनुभव पाहता यावर्षी कृषी विभागाने दोन महिने आधीच सुरूवात केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाणांची अडचण भासू नये, म्हणून यावर्षी कृषी विभागाकडून लवकर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 2 लाख 88 हजार 237 हेक्टर आहे. त्यापैकी 1 लाख 87 हजार 300 हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात बियाणांची कमी-अधिक प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामध्ये 2016 मध्ये 22 हजार 783 क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने बियाणांची मागणी नोंदविली आहे.
बियाणांच्या पुरवठ्यासाठी खासगी कंपन्यांकडून 11 हजार 204, तर महाबीज व राष्ट्रीय बीज निगम विभागाकडून 15 हजार 369 किंवटल बियाणे पुरवले जाणार आहेत. यावर्षी खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाण्यांमध्ये संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, ताग आदींच्या बियाण्यांचा समावेश आहे. दरम्यान, पेरणी केल्यावर शेतकऱ्यांना खतांची कमतरता पडू नये, यासाठी यंदा युरिया, डीएपी, एमओपी आणि एसएसपी खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जवळपास 1 लाख 70 हजार 670 टन खते शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.