मंचर – आंबेगाव-शिरुर तालुक्यातील जनतेने विधान-सभेला परिवर्तन करायचे ठरवले असून विरोधी पक्षाच्या उमेदवाराची चर्चा करण्यापेक्षा शिवसेनेचा उमेदवार कसा जिंकून येईल याचे सकारात्मक नियोजन करावे. सर्व इच्छुक उमेदवार व शिवसैनिकांच्या एकमताने आंबेगाव-शिरूर विधानसभेचा उमेदवार लवकर ठरविला जाणार आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ शिवसैनिक व प्रत्येक गावातील स्थानिक कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन संघटनात्मक बांधणीवर भर देऊन काम करावे, असे आवाहन माजी खासदार तथा शिवसेना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील शिवसेना व सर्व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत वडगाव काशिंबेग फाट येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पलांडे, युवानेते अक्षय आढळराव पाटील, सरपंच दत्ता गांजाळे, उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, शिरूर तालुकाप्रमुख गणेश जामदार, माजी तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, राम तोडकर, अशोक बाजारे, महेश ढमढेरे, युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, जिल्हा समन्वयक सुरेश भोर, पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, दीपक घोलप, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मालती थोरात, तालुका संघटक स्नेहलता मोरे, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी कल्पेश बाणखेले, माऊली घोडे, दिलीप पवळे, संतोष डोके, अशोक थोरात, अजित चव्हाण, गोविंद काळे यांच्यासह शिवसेना व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आढळराव म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे 15 वर्षे काम केले आहे. येणाऱ्या काळात युती सरकारच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या माध्यमातून अधिक जबाबदारीने व जोमाने काम करणार आहे. जनतेचा विश्वास संपादन करुन आंबेगाव-शिरुर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी विचारविनिमयाने विधानसभेसाठी उमेदवार ठरविला जाणार आहे.