नवी दिल्ली – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. अंतिम टप्प्यातील मतदानामध्ये पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी मतदान होत आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेश 13 जागा, पश्चिम बंगाल 9 जागा, बिहार आणि मध्य प्रदेश प्रत्येकी 8 जागा, हिमाचल प्रदेश 4 जागा, झारखंडमध्ये 3 जागा अशा एकूण ५९ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. चंडीगढमधील एकमेव जागेसाठीही आज मतदार त्यांचा हक्क बजावत आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामधील ५९ जागांसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी एकूण 51.95 टक्के मतदान झाले आहे. सातव्या टप्प्यातील मतदानासाठी आज सकाळपासूनच मतदारांनी उपस्थिती लावली आहे. अनेकवेळा नागरिक लोकशाही प्रक्रियेतील सर्वोच्च असलेला मतदानाचा हक्क बजावताना दिसत नाहीत मात्र अशा मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या नागरिकांसाठी इंदोर येथील विक्रम अग्निहोत्री यांचे उदाहरण मतदान करण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.मूळचे इंदोरचे रहिवासी असणाऱ्या विक्रम अग्निहोत्री यांनी आपले दोन्ही हात वयाच्या अवघ्या ७व्या एका वर्षी अपघातामध्ये गमावले. मात्र दोन्ही हात नसनेही त्यांना लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार बजावण्यापासून रोखू शकले नाही. अग्निहोत्री यांनी आज इंदोर येथील एका मतदानकेंद्रावर हात नसल्याने पायाच्या बोटावर शाई लावून घेत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.