पालकमंत्र्यांनी केली वादळाने पडलेल्या शाळेची पाहणी
नुकसानीमुळे मुलांच्या बसण्याचा प्रश्न आला ऐरणीवरमुलांच्या शाळेत बसण्याची व्यवस्था
येथील मुलीच्या शाळेतील सहा खोल्याचे पत्रे उडून गेल्याने, वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे शिक्षण समितीने शाळेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. मुलींची शाळा मुलांच्या शाळेत होणार असून, सकाळी 7.15 वा. ते 12. 15 आणि दुपारी 12. 30 ते 5. 30 या वेळेत मुलांच्या शाळेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जामखेड – जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींच्या शाळेच्या सोमवारी झालेल्या वादळाने दहा पैकी सहा वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेल्याने अधिक प्रमाणात शाळेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी करून, शाळेच्या नवीन इमारतीसाठी तत्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश पंचायत समितीला दिले आहेत.
पालकमंत्री ना. राम शिंदे हे विविध खासगी कार्यक्रमानिमित्त जामखेड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी अशोक शेळके, गटशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे, नगराध्यक्ष निखील घायतडक, नगरसेवक महेश निमोणकर, अमित चिंतामणी, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, उपअभियंता संजय पानसरे, मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा खेडकर, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक गणेश चव्हाण, केंद्रप्रमुख निलकंठ घायतडक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार सोनार, शैलजा बडे याच्यासह नागरिक उपस्थित होते.
शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींची शाळा येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या वादळाने सहा वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने, अधिक प्रमाणात शाळेचे नुकसान झाले. आता या शाळेतील मुले 417, मुली 357 असे एकूण 774 या शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे हाच प्रश्न शिक्षकांना पडला आहे. 2010 मध्ये या नूतन बांधकामासाठी जिल्हापरिषदेकडून 11 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला, मात्र शाळेच्या जागेच्या वादाने मंजूर निधी पुन्हा गेला.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत शाळेला भेट दिली. यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी शाळेच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त करून, शिक्षिका शैलजा बडे यांनी शाळेच्या धोकादायक खोल्या पाडण्यासाठी जिल्हा परिषदेला दोन वर्षापूर्वी प्रस्ताव दिला आहे. याकडे आपण लक्ष देण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री म्हणाले की, जामखेड जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था अधिक प्रमाणावर झाली असून, लवकरात लवकर शाळेचे बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, असे आदेश पंचायत समितीला दिले. तसेच धोकादायक इमारत पाडण्यासंधर्भातही निर्णय घेऊ असे सांगितले.