नवी दिल्ली: एकीकडे दिल्लीत लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असून राजकीय नेतेमंडळी मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. मात्र दुसरीकडे सामूहिक बलात्कारचा शिकार झालेल्या विद्यार्थिनीच्या आई आशा देवी आणि वडील बद्रीनाथ सिंह यांनी यावेळी मतदान करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. २०१२ मध्ये संपूर्ण देशाला हादरवणारे प्रकरण घडले. पीडित निर्भयावर (काल्पनिक नाव) सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर पीडितेचा मृत्य झाला होता.
निर्भयाचे पालक म्हणाले, अनेक राजकीय पक्षांनी आम्हाला न्याय देण्याचे आश्वासन दिले. मात्र आता आम्ही थकलो असून राजकीय पक्षांकडून दाखवली जाणारी सहानुभूती आणि आश्वासन केवळ राजकीय नाट्य आहे. कारण गुन्हेगार आजपर्यंत जिवंत आहेत. आज रस्ते शहरातील महिला आणि बालकांसाठी असुरक्षित आहेत. सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतेच ठोस पाऊले उचलली नाही. असा आरोप निर्भयाच्या पालकांनी केला आहे.
सीसीटीवी कॅमेरे सुद्धा आतापर्यंत लावण्यात आले नाही. देश अजूनही असुरक्षित आहे. आई-वडील आपली मुलगी घरी येई पर्यंत चिंतेत असतात. आशा देवी म्हणाल्या, लोकांचा व्यवस्थेवर विश्वास नाही. यावेळी मला कोणत्याच पक्षाला मतदान करण्याची इच्छा नसून माझ्या मुलीवर दुष्कर्म होऊन आणि तिची हत्या होऊन ७ वर्षे झाली. मात्र गुन्हेगारांना आतापर्यंत शिक्षा झाली नाही.
निर्भयाचे वडील म्हणाले, यावेळी मला कुणालाच मतदान करण्याची इच्छा नाही. माझा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. सर्व राजकीय पक्ष महिलांचा सम्मान आणि सशक्तिकरणाच्या गप्पा मारतात. मात्र त्यांच्या जवळ यावर कोणत्याच ठोस उपाय-योजना नाहीत. तसेच २०१३’च्या बजेटमध्ये घोषित करण्यात आलेल्या निर्भया निधीचा योग्य प्रकारे वापर करण्यात आला नसल्याचे बद्रीनाथ सिंह म्हणाले.