भाजपचा पलटवार: जनमताचा आदर करावा
लखनौ – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि बसपच्या प्रमुख मायावती यांना त्यांच्या पक्षांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने नैराश्य आले आहे. त्यातून त्या उत्तरप्रदेश सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका करत आहेत, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला.
भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष विरेंद्र सिंह मस्त उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावले. प्रियांका आणि मायावती सातत्याने कायदा-सुव्यवस्था स्थिती आणि इतर मुद्द्यांवरून उत्तरप्रदेश सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, त्यांनी जनमताचा आदर करावा. निवडणूक हरल्यानंतर जनमताचा आदर राखण्याची परंपरा लोकशाहीत आहे.
त्यामुळे लोकशाही मजबूूत होते, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया मस्त यांनी बलियात पत्रकारांशी बोलताना दिली. कायदा-सुव्यवस्था स्थितीत सुधारणा करण्यासाठी उत्तरप्रदेश आणि केंद्रातील सरकारे सातत्यपूर्ण पाऊले उचलत आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक पाऊले उचलण्यास सज्ज झाले आहे. वयाची साठी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन दिले जाणार आहे. त्यामुळे मोठे बदल घडतील, असा दावा त्यांनी पुढे बोलताना केला.