संतप्त पालकांमधून होतेय मागणी
शिरवळ – शिरवळसह परिसरातील लहान मोठ्या गावात खासगी शिकवणीचे पेव फुटले असून भरमसाठ फी घेऊन पालकांची लूट करण्याचा उद्योग जोमात सुरू आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त पालकामधून होत आहे.
सध्या दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लागले असून नवीन प्रवेश घेताना अनेक शाळा, विद्यालयात गुणपत्रक पाहून त्यास प्रवेश दिला जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांची परीक्षेतील मार्कांची टक्केवारी ही पालकांची प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. त्यामुळे आपला मुलगा, मुलगी चांगल्या मार्कांने पास झाला पाहिजे. यासाठी पालकांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. त्यातूनच खासगी शाळेत प्रवेश घेतला जात आहे.
मात्र त्याच शाळेतील कमीत कमी पगातरात शिकविणारे शिक्षक किंवा पदवीधार शिक्षक यासह ज्यांना शिक्षण क्षेत्रातील कोणतेही ज्ञान अवगत नाही, असे स्वत:चे खासगी क्लास सुरू करुन पालकांकडे पाल्याला खासगी शिकवणीसाठी आग्रह धरत आहेत. त्यामुळे पालक वर्गांत नाराजी पसरली असून जास्त वेळ कष्ट करून पैसे कमवून मुलांसाठी खासगी शिकवणी लावावी लागत आहे. तसेच असे शिक्षक खासगी शिकवणीसाठी अव्वाच्यासव्वा फी आकारून पालकांना लुटण्याचा उद्योग करीत आहेत.
शिकवणीमध्ये जागा उपलब्ध नसते, प्रकाश नसतो, बैठक व्यवस्थाही नसते तरीही ते उघड माथ्याने शिकवणी घेत असातत. त्यामुळे त्यांच्यावर शिक्षण संस्थाचे किंवा प्रशासकीय वचक राहिलेला नाही. त्यामुळे अशा सुरू असलेल्या शिकवणीची चौकशी करून ज्यांच्याकडे परवानगी नाही अशा शिकवणी बहाद्दरांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे.