कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे. आठवड्याभरापूर्वीच्या भाषणात पंतप्रधानांनी केलेल्या आरोपाबद्दल त्यांनी ही नोटीस पाठवून पंतप्रधानांना माफी मागण्याची मागणी केली आहे. या माग्णीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना 36 तासांची मुदतही दिली आहे. अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बासू यांनी ही माहिती दिली आहे.
कोणतीही खातरजमा न करता, सनसनाटी पसरवण्याच्या उद्देशाने आणि चूकीच्या माहितीच्या आधारे उघडपणे पक्षाच्या सदस्यांवतीनेच अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, असे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. या नोटीसीची प्रत भाजप मुख्यालयातही पाठवण्यात आली आहे. मात्र ही एक निरर्थक कृती असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. निवडणूकीमध्ये पराभव होण्याच्या भीतीपोटी ही नोटीस पाठवली गेल्याचे भाजपने म्हटले आहे.
डायमंड हार्बर येथे 15 मे रोजी झालेल्या सभेमध्ये मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना “बुवा भतिजा सरकार’ असा उल्लेख केला होता.