मै भी चोैकीदार मोहीमेत मोदींनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या विविध भागातील भाजप कार्यकर्त्यांशी व नागरीकांशी मै भी चौकीदार अभियाना अंतर्गत नमो ऍपवरून संवाद साधला. देशाचा चौकीदार म्हणून काम करताना मी नागरीकांच्या पैशाचे रक्षण करेन तसेच देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचेही जागरूकपणे रक्षण करेन अशी ग्वाही त्यांनी नागरीकांना दिली आहे.
देशातल्या प्रत्येक वर्गातील नागरीक आज मै भी चौकीदार मोहीमेत सहभागी झाला आहे. याद्वारे तो देशसेवेशी जोडला गेला आहे. मी स्वताही एक चौकीदार म्हणूनच देशाची सेवा बजावत आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की मला स्वताला कोणीही मागे पुढे नाही त्यामुळे मी कुटुंबासाठी संपत्त्ती जमवण्याचा प्रश्नच नाही. माझ्यासाठी देश सर्वतोपरी असून देशातील 125 कोटी जनतेचे हित हेच आपले उद्दीष्ठ राहिले आहे. या कर्तव्यात आपण कसलाही कसुर करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बालाकोट येथे झालेला हल्ला आणि पुलवामाच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की बालाकोट येथील कारवाई
आपल्या सैनिकांनी केली. ती कारवाई लपवण्याचा आटोकाट प्रयत्न पाकिस्तानने केला. हा हल्ला लपवण्याचा त्यांचा एक प्रमुख उद्देश असा होता की बालाकोट येथील दहशतवादी तळावर भारताने हा हल्ला केला आहे असे जर त्यांनी मान्य केले असते तर पाकिस्तानात दहशतवादी अड्डे आहेत याची त्यांनी कबुली दिली आहे असा अर्थ लावला गेला असता म्हणून पाकिस्तान ही दडपादडपी करीत आहेत.
देशातील काही बुद्धीवादी लोक त्यांच्याच भाषेत बोलत आहेत असा आक्षेपही त्यांनी घेतला. काही जणांच्या बौद्धिक क्षमतेचा विकासच झालेला नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली. सन 2014 च्या निवडणुकीत मी नवा होतो. त्यावेळी विरोधकांनी माझ्यावर टीका करून मला मोठीच प्रसिद्धी मिळवून दिली त्याचा मला लाभ झाला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असेही त्यांनी यावेळी खोचकपणे नमूद केले.