उत्तम पिंगळे
कित्येक वेळा आपण म्हणतो की आता पैशाला किंमत उरली नाही. म्हणजे आमची आजी म्हणायची की त्या वेळेला 9 रुपयाला तांदुळाचे पोते मिळायचे किंवा माझ्या मुलाला मी सांगतो की 1990 साली पेट्रोल 10 रुपये लिटर होते किंवा 1977 ला तर साखर अडीच रुपये किलो होती. मला जसे आजीचे ऐकून आश्चर्य वाटायचे तसे माझ्या मुलाला वाटते. पण माझ्यापेक्षा कमी. कारण मुलांना आजकल सापेक्ष किंमतही समजू लागली आहे. पण खरोखरच पैशांचे मूल्य कमी झाले आहे का? तर नक्कीच हो. आज आपण एखादी वस्तू घेण्यासाठी जेव्हा पैसे मोजतो त्यावेळी तीच वस्तू पूर्वी खूप कमी रुपयात मिळत होती. म्हणजे त्या वेळी रुपयाला खूप किंमत होती. आमच्या लहानपणी म्हणजे 1970 च्या वेळी जत्रेसाठी आम्हाला एक रुपया मिळायचा. आम्ही सर्वजण पहाटेच गावाबाहेर शिव मंदिरात जात असू. तेथे नंतर एक रुपयांमध्ये खेळणी खरेदी जसे पाण्याचे चेंडू, पिपाणी, भोंगा असे घेत असू. अशा वस्तू आता जत्रेमध्ये असतात; पण त्यांना पैसेही खूप मोजावे लागतात.
आता माणसाला किंवा व्यक्तीला काही किंमत आहे काय? याचे खरे उत्तर तर आपण एखाद्या जीवाची किंमत करू शकत नाही किंवा जीवन हे अनमोल आहे असे म्हटले जाते. पण वास्तवात आता त्याचीही किंमत होऊ लागली आहे. म्हणजे तशी थेट किंमत आपण म्हणू शकत नाही. पण आपण ऐकतोच की एखादा रेल्वे अपघात झाला वा कुठे चेंगराचेंगरी झाली, पूल पडला अशा वेळी मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास काही भरपाई दिली जाते. आता ती त्याची किंमत म्हणायची का? तर निश्चितच नाही. पण घरातील कर्ता पुरुष गेला असेल तर त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांच्या भविष्यासाठी काही तरतूद तर करू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवास काही तरी मूल्य आले.
अर्थात तेही सापेक्ष आहे म्हणजे बघा, अशी व्यक्ती घरातच काही हृदयविकाराने वगैरे गेली तर त्याला कुणी मदत देणार नाही. म्हणजेच सरकारच्या दृष्टीने त्या वेळी त्याची काही किंमत असते का? तर नाही. पण अशा व्यक्तीने विमा काढला असेल तर त्याला नक्कीच कवच मिळू शकते. विमा क्षेत्र नवीन आले त्यावेळी विमा एजंटला तर लोक यमराजच समजत. भविष्यात काही बरेवाईट झाले तर… याचा विचार त्यावेळी लोक करत नसत. आता बरेचसे लोक स्वतःच्या ऐपतीप्रमाणे स्वतःचा विमा काढू लागले आहेत. म्हणजेच एका अर्थाने किंमत करू लागले आहेत.
विमा काढून आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या भविष्यासाठी काही तरी बेगमी करू लागले आहेत. म्हणजे अशा व्यक्तीचे काही बरेवाईट झाल्यास विम्याची रक्कम त्यांच्या वारसांना मिळू शकते. म्हणजे पैशाला किंमत आहे की नाही? पण सुरुवातीलाच आपण पैशाला काही किंमत नाही, असे म्हणालो होतो. तर या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. पैशांची किंमत घसरलेली आहे; पण पैशाला महत्त्वही आलेले आहे. कितीतरी गोष्टी आपण “आपल्याकडे पैसा आहे की नाही’ यावर “त्या करू शकतो की नाही’ ते ठरवले जाते. कित्येकदा पैसा नसल्यामुळे शिक्षण झाले नाही किंवा पैसा नसल्याने घर बांधायचे राहून गेल्याचे आपण बरेचदा ऐकतो. म्हणजेच पैशाला किंमत ही असतेच; पण ती हळूहळू कमी होत आहे आणि शेवटी ती किंमत सापेक्ष असते.
चलनी रुपया तोच असला तरी त्याची किंमत व्यक्तीनुसार बदलत असते. अशिक्षित व मजुरी करणाऱ्या माणसाला एका दिवसाचे वेतन ही मोठी रक्कम वाटत असते. त्यामधून तो त्याचे कुटुंब पोसत असतो. तर दुसरीकडे श्रीमंत व्यक्ती एखाद्या वेटरला एवढी टिप देते. म्हणजेच पैशांची किंमत ही व्यक्तिसापेक्ष असते. गरीब लोक त्यांच्या गरजा अत्यंत सीमित ठेवत असतात. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पैशाला खूप किंमत असते. अनेक सुविधा ते पैशांच्या अभावी घेऊ शकत नाहीत. दुसरीकडे गर्भश्रीमंत व्यक्ती वाटेल तेथे, वाटेल तेव्हा, वाटेल तेवढे पैसे केवळ मजा व टाइमपास म्हणूनही उडवितो. कारण त्याच्या दृष्टीने पैशाची “तेवढीच’ किंमत असते.