सोलापूर: राज्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस वाढत असतानाच दुष्काळावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरवात झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दुष्काळावरून जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळाच्या राजकारणावरुन शरद पवारांना खुले आव्हान केले आहे. आपण दुष्काळाबाबत भरचौकात चर्चा करायला तयार आहोत. जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर असो दुष्काळात राज्यात चारा कमी आहे की जास्त याबाबत भरचौकात त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार असल्याचे पाटील म्हणाले.
दुष्काळात शेतकऱ्याला दिलासा द्यायला हवा, मात्र सत्ताधाऱ्यांना काही कळत नाही, असे बोलणे चुकीचे आहे. दुष्काळावरुन राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दुष्काळावरून राज्य सरकारला घेरत टीका केली होती. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना थेट चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे.