नवी दिल्ली : घरात वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे. अर्थात केंद्र सरकार आता घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत आहे.त्यासाठी वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती एका संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे.
केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या योजनेबाबत सांगितले माहिती दिली आहे. भारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहे, यामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता येणार आहे. तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्र, यासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील. या प्रीपेड योजनेसाठी केंद्र सरकारने 2022चे लक्ष्य निश्चित केले आहे. यानंतर लोकांना आपल्या घरामध्ये वीज मीटर रिचार्ज केल्याशिवाय वीज वापरता येणार नाही. यासाठी ग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे वीज रिचार्ज करावी लागणार आहे. हे रिचार्ज संपल्यानंतर आपोआपच ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा बंद होणार आहे.